पुणे : कृष्णा नदीला नुकत्याच आलेल्या महापुरात स्वतःच्या जिवावर उदार होऊन सुमारे पाच हजार जणांचे प्राण वाचवणाऱ्या धुळाप्पा आंबी (पुजारी) या नावाड्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुण्यातील नगरसेवक आबा बागुल यांनी पुणे नवरात्रौ महोत्सव समितीतर्फे ११ हजार रुपये, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार केला आहे.
आलास (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) हे कृष्णा नदीच्या तीरावर वसलेले नरसोबाच्या वाडीपासून १० किलोमीटर अंतरावर असलेले गाव. धुळाप्पा याच गावातील एक गरीब रहिवासी. नावेतून लोकांना पैलतीराला सोडणे या व्यवसायातून त्यांच्या कुटुंबाची उपजीविका चालते. नुकत्याच आलेल्या महापुरातून त्यांचे गावही वाचले नाही. हे गाव तसे टोकाला असल्याने एनडीआरएफ किंवा प्रशासनाची मदत पोहोचायला थोडा उशीर झाला; मात्र अशा परिस्थितीत धुळाप्पांनी योगेश आणि गजानन या आपल्या दोन मुलांसह लोकांना वाचवण्याचे काम हाती घेतले. स्वतः नावाडी असल्याने होडी चालवणे ही गोष्ट त्यांच्यासाठी कठीण नव्हती; पण रौद्रभीषण प्रलयात होडी चालवणे हे खूप धोकादायक आणि आव्हानात्मक काम होते. त्या स्थितीतही त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आठवडाभरात पाच हजार लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचवून त्यांची पुरातून सुटका केली. सलग १२-१२ तासही त्यांनी होडी चालवली. धुळाप्पांच्या या अतुलनीय पराक्रमाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आबा बागुल यांनी त्याच्या या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, घनःश्याम सावंत, रमेश भंडारी, अमित बागुल, संजय पवार, कपिल बागुल, विलास रत्नपारखी, सागर आरोळे, संतोष पवार, रजपूत, धनंजय कांबळे, इम्तियाज तांबोळी, अभिषेक बागुल, महेश ढवळे उपस्थित होते.